Mumbai Goa Highway : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अपूर्ण काम, खड्डे, अपघात, मृत्यू… तक्रारींचा ढीग वाढत गेला, पण बदल काहीच नाही. याच परिस्थितीला वैतागून महाराष्ट्रातील एका तरुण अभियंत्याने आंदोलनाची नवी वाट निवडली – थेट रस्त्यावर उतरून, पायी चालत सत्य समोर आणण्याची.
कोण आहे हा तरुण?
हा तरुण म्हणजे रायगड जिल्ह्यातील 28 वर्षीय अभियंता चैतन्य पाटील. गेली पाच वर्षे मुंबई–गोवा महामार्गावरील अपघात, मृत्यू आणि रखडलेली कामे तो स्वतः पाहत होता. तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर त्याने निर्णय घेतला, “घोषणाबाजी नाही, उपोषण नाही… मी स्वतः रस्ता चालून पाहणार.”
Parliament states that NH-66 is 89% complete.
— Er. Chaitanya Usha Laxman Patil (@chaitanyulpatil) December 18, 2025
However, this image reflects the ground reality a seemingly good stretch abruptly turns hazardous due to potholes, cracks, and unsafe gaps, posing a serious risk to commuters’ lives.@ravish_journo @suchetadalal pic.twitter.com/Gu8ibUFQKY
‘रस्ता सत्याग्रह’ – 29 दिवसांचा संघर्ष
चैतन्य पाटील यांनी 9 ऑगस्ट रोजी रायगडमधील पालस्पे येथून ‘रस्ता सत्याग्रह’ सुरू केला. तब्बल 29 दिवसांत 490 किमी पायी प्रवास करत त्यांनी संपूर्ण मुंबई–गोवा महामार्ग चालून पूर्ण केला. हा प्रवास 20 ऑक्टोबर रोजी संपला.
या दरम्यान त्यांनी रस्त्यावरील प्रत्येक गंभीर समस्या बारकाईने नोंदवली.
59 ‘क्रिटिकल हॅझर्ड पॉइंट्स’ उघडकीस
या पायी प्रवासात चैतन्य पाटील यांनी महामार्गावरील 59 अतिशय धोकादायक ठिकाणे (Critical Hazard Points) ओळखली. यात –
- पूर्णपणे तुटलेले रस्ते
- खोल खड्डे
- अर्धवट पुलांची कामे
- दिशादर्शक फलकांचा अभाव
- अपूर्ण सर्व्हिस रोड
- लोखंडी तुकडे, काचांचे तुकडे, पडलेले होर्डिंग
- पावसाळ्यात जीवघेण्या बनणाऱ्या ठिकाणांचा समावेश आहे
त्यांच्या मते, 75 ते 85 किमी महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण आहे, विशेषतः पुलांच्या परिसरात.
490KM | 29 Days | Rasta Satyagraha | On-foot NH66 Audit
— Er. Chaitanya Usha Laxman Patil (@chaitanyulpatil) December 17, 2025
How can you support?
You don’t need to like or subscribe to any video.
No money needed only constitutional support.
Just tag the concerned officials, ministers, and authorities.@suchetadalal @anjali_damania @IndianGems_ pic.twitter.com/xRRTWlx7RT
पुराव्यासह अहवाल – फोटो, व्हिडीओ आणि GPS डेटा
चैतन्य पाटील यांनी केवळ आरोप न करता प्रत्येक ठिकाणाचे फोटो, व्हिडीओ आणि GPS लोकेशन जमा केले. आधुनिक डिजिटल टूल्स वापरून त्यांनी एक सविस्तर अहवाल तयार केला, ज्यामध्ये QR कोड्सच्या माध्यमातून थेट लोकेशन पाहण्याची सुविधा देण्यात आली.
हा संपूर्ण अहवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठवण्यात आला.
“लोकांचे प्राण खराब रस्त्यांमुळे धोक्यात येऊ नयेत”
चैतन्य पाटील म्हणतात,
“माझा एकच उद्देश आहे – मुंबई–गोवा महामार्ग सुरक्षित, अपघातमुक्त आणि दर्जेदार व्हावा. खराब रस्त्यांमुळे सामान्य लोकांचे प्राण धोक्यात येऊ नयेत.”
माणुसकीचा क्षण – रस्त्यावर पडलेल्या कुत्र्याला वाचवले
या प्रवासादरम्यान एक भावनिक घटना घडली. महामार्गावर जखमी अवस्थेत पडलेला एक कुत्रा पाहून अनेक वाहने न थांबता पुढे गेली.
मात्र चैतन्य यांनी तात्काळ थांबून त्या कुत्र्याला बाजूला हलवले.
त्यांनी सोशल मीडियावर लिहिले –
“अनेक गाड्या गेल्या, पण कोणी थांबले नाही. मी थांबलो. एक छोटा प्रयत्न… पण मोठा संदेश – रस्त्यावर प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे.”
सोशल मीडियावर संताप आणि प्रश्न
या ‘रस्ता सत्याग्रहा’नंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
एका युजरने लिहिले,
“490 किमी चालून जर ऐकून घ्यावं लागत असेल, तर ही प्रेरणादायी नव्हे, तर लाजीरवाणी गोष्ट आहे.”
दुसऱ्याने प्रश्न उपस्थित केला,
“सामान्य माणसालाच सगळं करावं लागत असेल, तर लाखोंचे पगार घेणाऱ्या नेत्यांची गरज काय?”
तर एका युजरने स्पष्ट शब्दांत म्हटलं,
“ही मोटिवेशनल नाही, तर दुर्दैवी कथा आहे.”