भारतातील रस्त्यांवर सर्वाधिक वापरले जाणारे सार्वजनिक वाहन म्हणजे ऑटो-रिक्शा. शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवर, अरुंद गल्लीबोळातून झपाट्याने धावणारे हे वाहन लोकांच्या दैनंदिन प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. पण असा प्रश्न तुमच्या मनात कधी तरी आला का – ऑटो-रिक्शाला फक्त तीनच चाकं का असतात? मग कारसारखी चार चाकं का नाहीत? तज्ज्ञ सांगतात की या मागे अतिशय महत्त्वाची तांत्रिक आणि आर्थिक कारणं दडलेली आहेत.
परवडणाऱ्या किंमतीचं मोठं रहस्य
ऑटो-रिक्शांना तीन चाकं ठेवण्याचं सर्वात मूलभूत कारण म्हणजे कमी खर्च. चार चाकं लावली तर वाहनाचं वजन वाढेल आणि निर्मिती खर्चही खूप वाढेल. मात्र तीन चाकांमुळे वाहन हलकं राहतं आणि त्याची निर्मिती अधिक स्वस्त पडते. यामुळे ऑटो चालकांसाठी हे वाहन परवडणारे होते, जे भारतासारख्या देशात मोठं महत्त्वाचं आहे कारण हजारो लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न या वाहनांवर अवलंबून असतो.
हेही वाचा – भारतात लाँच झाली 1.76 कोटीची खतरनाक गाडी, 2.5 सेकंदात 100 चा स्पीड!
ट्रॅफिकमध्ये जबरदस्त नेव्हिगेशन
तीन चाकांच्या डिझाइनमुळे ऑटो अत्यंत चपळ बनतात. समोरील एकच चाक वाहनाला तीक्ष्ण वळणं घेण्याची क्षमता देते. शहरातील अरुंद गल्ल्यांत, बाजारपेठेत किंवा ट्रॅफिक जॅममध्ये चालक सहज मार्ग काढू शकतात. म्हणूनच शहरी वाहतुकीसाठी ऑटो-रिक्शा हे सर्वात सुयोग्य आणि वेगवान साधन ठरतात.
अत्यंत कमी इंधन खर्च – सर्वात मोठा फायदा
तीन चाकांमुळे वाहनाचं वजन कमी राहतं, आणि यामुळे इंधनाची बचत होते. हलके वाहन असल्याने इंजिन कमी ताकद वापरूनही जास्त अंतर पार करते. यामुळे दिवसभर रस्त्यावर धावणाऱ्या चालकांना इंधन खर्चात मोठा फरक जाणवतो. जर वाहनाला चार चाकं असती, तर त्याला जास्त इंधन लागतं आणि देखभालीचा खर्चही वाढला असता.